Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)

प्रस्तावना

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना शासन निर्णय दि.०८.०८.२०१९ अन्वये (कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८ नुसार) केली आहे. या अंतर्गत लक्षीत प्रवर्गासाठी उद्देशीत कार्यक्षेत्र व विशेष घटक स्थापिले आहेत.
• इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT), आणि विशेष मागास वर्ग (SBC) तसेच शासन किंवा महाज्योतीने निश्चित केलेल्या वंचित व उपेक्षित जनसमुहांशी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा अभ्यास करणे आणि शासनास त्यावरील उपाययोजना सुचविणे.
• प्रमुख संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणून काम करणे व लक्ष्य गटांसाठी समाजिक शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी विविध उपक्रम राबविणे.
• कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच रोजगार, स्वयंरोजगार, उद्यमशिलता, औद्योगिक घटकांची उभारणी व विकास यासाठी क्षमता निर्मित करणे, विविध सर्वेक्षण व संशोधन करुन एक डाटा बॅंक, ग्रंथालये, ज्ञान बॅंक (knowledge bank) विविध क्षेत्रातील अभ्यास व समन्वय मंडळे स्थापन करणे, ते विकसित करणे, त्याची देखरेख करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे.
• वंचित घटकातील विद्यार्थी, लघु उद्योजक, शेतकरी आणि महिलांना विकासाची दिशा दाखवणारे, मार्गदर्शन करणारे, समुपदेशन केंद्रे स्थापन करणे.
• व्यक्तिमत्त्व विकास, नोकरीसाठी विविध स्पर्धा परीक्षा, उद्योग, व्यवसाय इत्यादींसाठी प्रशिक्षण, कोचिंग इ. प्रदान करणे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टायपेंड, शिष्यवृत्ती, फेलोशिप अनुदान देणे. लक्ष्य गटांची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी धोरणात्मक कार्यवाही करणे.
• सामाजिक शास्त्राच्या विविध क्षेत्रांशी संबंधित विविध कार्यक्रम, उपक्रम इत्यादींशी संबंधित कृती संशोधन कार्यक्रम राबवणे. लक्ष्य गटांकरिता सामाजिक नियोजन, घटनात्मक कर्तव्ये आणि अधिकारांसह विविध क्षेत्रांमध्ये योग्य आणि व्यावसायिक कौशल्य प्राप्त करणे.
• राष्ट्रीय एकात्मता आणि वैज्ञानिक स्वभावाचा प्रचार करणे. त्याकरिता बंधुता, जातीय सलोखा आणि शांततापूर्ण सहअस्तित्व वाढवणे. स्वच्छता, सत्यशोधक विवाह, व्यसनमुक्ती, आणि पर्यावरणाबद्दल जागृकता निर्माण करणे.
• समानता आणि सामाजिक न्यायाचा प्रचार प्रसार करणे. लिंगभेद, जातीय भेदभाव, वंश पूर्वाग्रह आणि अंधश्रद्धा दूर करणे.
• महिला सक्षमीकरणाकरिता हुंडा निर्मूलन, जात-पंचायती, सामाजिक बहिष्कार, घरगुती हिंसाचार याबाबत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवणे. समाजिक माध्यमांचा वापर करुन यावर निबंध, वाद-विवाद, चर्चा घडवून आणने. माध्यमात प्रकाशित करणे.
• रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, कृषी औद्योगिक घटकांसह औद्योगिक युनिट्सची स्थापना आणि विकास यासाठी क्षमता निर्माण करणे. त्याकरिता विविध सर्वेक्षणाचा अभ्यास करणे. मूल्यमापन कौशल्य विकास प्रशिक्षण राबवणे.
दि.२६.०२.२०२० च्या शासन निर्णयान्वये संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे. महाज्योतीच्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ पोहचविणे सुलभ व्हावे या हेतूने महाज्योतीचे विभागीय कार्यालय औरंगाबाद, नाशिक येथे सुरु करण्यात आलेले असून पुणे, मुंबई व अमरावती येथे विभागीय कार्यालय सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे.
महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास – प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, JEE/NEET/MHT-CET, MPSC, UPSC आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी या करिता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो तसेच विविध संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता पीएचडी व एम.फिल करणाऱ्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते.